|
|

कलाकृती रविवार, ३ जानेवारी, २०१०
जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या निर्मितीत दूरदर्शनचे मेकअप आर्टीस्ट हा घटक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. कार्यक्रमात सहभागी होणार्या मान्यवर वक्त्यांचा आणि सूत्रसंचालकांचा मेकअप करुन त्यांचं व्यक्तिमत्व कॅमेर्यासमोर अधिक खुलेल, याची दक्षताही ही मेकअप आर्टीस्ट मंडळी घेत असतात.
मान्यवर वक्त्यांच्या चेहर्याची ठेवण, त्यांच्या चेहर्याचा रंग, त्यांनी परिधान केलेले कपडे, स्टुडिओतील लाईट व्यवस्था अशा अनेक बाबी विचारात घेऊन ही मंडळी आलेल्या मान्यवरांचं सौदर्य खुलवतात आणि पर्यायानं जय महाराष्ट्र कार्यक्रमाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करीत असतात.
या मेकअप आर्टीस्ट मंडळींचंही एक तत्वज्ञान आहे, जे फारच थोड्या लोकांना माहीत आहे. सर्वात पहिलं म्हणजे ही मंडळी रंगभूषा ही कला मानतात. आणि स्वत:ला कलावंत म्हणवून घेतात. त्यामुळे ते स्वत:चा उल्लेख आवर्जून मेकअप आर्टीस्ट असाच करतात. मेकअपमन असा नव्हे. हे लक्षात घ्यायला हवे.
तसंच त्यांनी केलेली रंगभूषा किंवा मेकअप म्हणजे त्यांची कलाकृती. ही कलाकृती निर्माण करताना ही मंडळी आपलं ज्ञान, कौशल्य आणि अनुभव पणाला लावून काम करतात. त्यामुळे कार्यक्रमात सहभागी होणार्या मान्यवरांच्या चेहर्याला झळाळी प्राप्त होते.
कार्यक्रम संपल्यावर जेव्हा मान्यवरांच्या चेहर्यावरुन रंगभूषा उतरवण्याचा प्रसंग येतो तेव्हा आपली एक कलाकृती नष्ट होतेय, अशी या मंडळींची भावना झालेली असते. त्यामुळे ही मंडळी आपली कलाकृती स्वत:च्या हातानं कधीच उतरवत नाहीत.
आपण केलेली रंगभूषा स्वत:च्याच हातानं पुसणं ही स्वत:च्या कलेशी केलेली प्रतारणा आहे, असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते हा प्रसंग टाळण्याचा नेहमी प्रयत्न करतात. तेव्हा या कलावंत मंडळींच्या कलाकृती विषयाच्या भावनेला सलाम...
'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
|
|